तांत्रिक कारणामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील टोल नाके तुर्तास सुरू होणार नाहीत

तांत्रिक कारणामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील टोल नाके तुर्तास सुरू होणार नाहीत

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव आणि रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील हातिवले येथील टोलनाके  आजपासून (१ जून) सुरू करण्यात येणार होते. याबाबतची जाहिरात वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामुळे आता मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना या मार्गावरून प्रवास करताना पैसे मोजावे लागणार होते. ओसरगावसोबत राजापूर-हातिवलेमधील टोलही आजपासून सुरू होणार होते मात्र यादरम्यान, याबाबत प्रशासनाशी संपर्क साधला असता, प्रशासनाने तांत्रिक अडचणी असल्यामुळे टोल सुरू होणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे वाहनधारकांसह दोन्ही जिल्हावासीयांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. सिंधुदुर्गात अनेक राजकीय पक्षांनी या टोल नाक्याला विरोध केला होता. एवढ्यात टोल सुरू करू नका, असं अनेकांनी म्हटलं होतं. टोल सुरू केला, तर आंदोलन करू, असा इशाराही देण्यात आला होता. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर चालणाऱ्या वाहनधारकांना थोडासा दिलासा मिळाला आहे मात्र हे टोल नाके केव्हा सुरू करण्यात येतील याबाबत प्रशासनाकडून औपचारिक रित्या माहिती देण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे