पुस्तकप्रेमींसाठी रंगणार साहित्यमेळा ठाण्यात पाचवा पुस्तक आदान प्रदान महोत्सव हजारो पुस्तकांची होणार देवाणघेवाण

पुस्तकप्रेमींसाठी रंगणार साहित्यमेळा   ठाण्यात पाचवा पुस्तक आदान प्रदान महोत्सव  हजारो पुस्तकांची होणार देवाणघेवाण

पुस्तकप्रेमींसाठी रंगणार साहित्यमेळा 

ठाण्यात पाचवा पुस्तक आदान प्रदान महोत्सव

  • हजारो पुस्तकांची होणार देवाणघेवाण
  • भरगच्च साहित्यिक कार्यक्रमांची मेजवानी.

 

ठाणे / दि. 24 वाचक रसिकांचा  उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला  पुस्तक आदान प्रदान महोत्सव ठाण्यात साजरा होणार आहे. व्यास क्रिएशन्स् आणि राज्ञी वुमन वेलफेअर असोसिएशनच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले आहे. संस्था पाचवा महोत्सव साजरा करीत आहे. आपण वाचलेले आणि संग्रहीअसलेले पुस्तक दान करा आणि तुम्हाला आवडेल ते पुस्तक घेऊन जा या संकल्पनेवर आधारित या महोत्सवात पुस्तक आदान प्रदानखेरीज भरगच्च साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

    तीन दिवस होणाऱ्या या महोत्सवात व्यास क्रिएशन्स प्रकाशित तब्ब्ल दहा पुस्तकांचे प्रकाशन केले जाणार आहे. गुरुवार  दि. २६ मे  रोजी सायंकाळी ५ वाजता महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री फ़ैयाज, ह. भ. प. बाबुराव कानडे  आणि लेखिका आणि अभिनेत्री दीप्ती भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी विद्यावाचस्पती  सौ. अनुराधा कुलकर्णी यांच्या  भारतीय संस्कृतीचे व्यवस्थापक महर्षी व्यास आणि आयुर्वेदवाचस्पती वैदय सुचित्रा कुलकर्णी यांच्या कबीरबोध या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

     शुक्रवार दि. २७ मे रोजी सकाळी १० वाजता वृंदा दाभोलकर  लिखित उमजलेलं सांगताना  या ललित पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ कवी अशोक बागवे, लेखिका संपदा जोगळेकर - कुलकर्णी आणि मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सुसंवादक धनश्री करमरकर यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे अभिवाचन होणार आहे. शुक्रवारीच संध्याकाळच्या सत्रात कौस्तुभ सावरकर रचित कप्पा या कवितासंग्रहाचे, विशाल कुलकर्णी यांच्या गोष्टींचा मळा तर माधुरी बागडे-अलई यांच्या असंच का? या बालसाहित्याचे प्रकाशन ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, सुप्रसिद्ध साहित्यिका प्रा. प्रतिभा सराफ  आणि लेखिका दीपा ठाणेकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी एक संध्याकाळ - कवितेसाठी हा कवितांचा कार्यक्रम निमंत्रित कवी सादर करतील. समीक्षक विकास भावे अध्यक्षस्थानी असतील. 

     शनिवार दिनांक २८ मे रोजी सकाळी १० वाजता डॉ. विजय कुलकर्णी यांच्या हुतात्मा कोश, श्री. वा. नेर्लेकर लिखित धगधगते यज्ञकुंड या पुस्तकाच्या नवव्या आवृत्तीचे, तर ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री मधुवंती दांडेकर यांच्या  मधुगंध : नाट्यपदांतील अर्थसौंदर्य या पुस्तकाचे प्रकाशन इतिहास अभ्यासक अरुणचंद्र पाठक, ज्येष्ठ गायक  व अभिनेते  अरविंद पिळगावकर आणि ज्येष्ठ साहित्यिक  प्रवीण दवणे यांच्या उपस्थितीत होणार आहे.

       शनिवारी सायंकाळी ४ वाजता आधाररेखा प्रतिष्ठान आणि व्यास क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने  आयोजित कार्यक्रमात रश्मी अरविंद जोशी लिखित आधाररेखा या पुस्तकाचे प्रकाशन कॅन्सर  योध्यांच्या हस्ते होईल. सायंकाळी ६ वाजता ज्येष्ठ कवी अशोक  नायगावकर, ज्येष्ठ उद्योजिका आणि चित्रपट निर्मात्या  मेधा मेहेंदळे,  लेखिका हर्षदा बोरकर यांच्या उपस्थितीत महोत्सवाची सांगता होईल. अध्यक्षस्थानी प्राचार्य अशोक चिटणीस असतील. यावेळी राज्ञी वुमन वेलफेअर असोसिएशन आयोजित महाराष्ट्र दिन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.  साहित्यप्रेमिनी मोठ्या संख्येने या महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन संचालक नीलेश गायकवाड आणि वैशाली गायकवाड  यांनी केले आहे.  अधिक माहितीसाठी व्यास क्रिएशन्स् च्याकार्यालयात तसेच ०२२२५४४७०३८ किंवा ९९२०९४९१७७ या क्रमांकावर संपर्क साधावा.