मान्सून आला असला तरी आजही गावागावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे

मान्सून आला असला तरी आजही गावागावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे
संग्रहित चित्र

कोकण लाईव्ह डिजिटल न्यूज

रत्नागिरी जिल्ह्यात मान्सून दाखल झाला मात्र अजून काही तितकासा जोर नसल्यामुळे जिल्ह्यातील गावागावांमध्ये पाणी टंचाईची झळ लोकांना सोसावी लागत आहे सध्या जिल्ह्यातील नव्वद गावांमधील 188 वाड्यात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे

रत्नागिरी  जिल्ह्यात मान्सून पावसाने जूनच्या पहिल्या आठवड्यात  हजेरी लावली आहे. मात्र, अजूनही तो स्थिर झालेला नाही. गेले तीन दिवस पावसाने दडी मारली आहे. सध्या दिवसा कडकडीत ऊन पडत आहे. यंदाचा उन्हाळा कडकडीत गेला होता. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात टंचाईची झळ अधिक बसलेली आहे.
आतापर्यंत सुमारे तेराशेहून अधिक टँकरच्या फेर्‍यांद्वारे लाखो लिटर पाणी 188 वाड्यांतील लोकांना पुरवले गेले. उन्हामुळे बाष्पीभवन अधिक झाल्यामुळे विहिरींची पाणीपातळी खालावली, नद्या-नाल्यांची पात्रे कोरडी पडली. परिणामी मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात पाण्याची चणचण जाणवू लागली. गतवर्षी 67 गावांतील 113 वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. यंदा त्यात वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी पाऊस झाला असला तरीही अजून नद्या, नाल्यांना पुरेसे पाणी आलेले नाही. त्यामुळे अजूनही अनेक भागांमध्ये टँकरने पाणी द्यावे लागत आहे.